महाराष्ट्र 24 तास | बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद आज सकाळपासूनच पाहायला मिळाले.
अहमदनगर/अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत होती. अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयराम चाटे आणि महेश केदार असे या आरोपींची नाव असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी सहा पथक स्थापन केले आहे. या पथकांकडून धाराशिव आणि बीडमध्ये शोध घेण्यात आला. अखेर या दोघांना केज तालुक्यातील तांबवा शिवारातून अटक करण्यात आली. शनिवारी झालेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये शांतता राखावी पुढील ४८ तासात आरोपींना अटक करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी, बीडच्या केज पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन घुले रा.टाकळी ता. केज याच्यासह अन्य पाच आरोपींवर कलम १४० (१),१२६,११८(१), ३२४(४) (५), १८९ (२), १९१(२), १९० नुसार गुन्हा दाखल आहे…
